महाराष्ट्र फाऊंडेशन दिलीप वि. चित्रे स्मृति-साहित्य जीवनगौरव सन्मान २०२०- महेश एलकुंचवार
स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचे नाटककार म्हणून महेश एलकुंचवार ओळखले जातात. त्यांच्या आत्मस्वरामुळे समकलीन नाटककारांत ते वेगळे उठून दिसतात. ‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘गार्बो’, ‘वाडा चिरेबंदी’ ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगांत’, ‘आत्मकथा’, ‘वासांसि जीर्णानि’, ‘सोनाटा’, ‘एका नटाचा मृत्यू’ ही महेश एलकुंचवार यांची काही महत्त्वाची नाटकं आहेत. त्यांचा भारतीय परंपरांचा, चित्रकलेचा, भारतीय तत्त्वज्ञानांचा, उपनिषदांचा भारतीय व पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास त्यांच्या लेखनातून प्रभावीपणे दिसून येतो. कलाकारांनी कायम आपल्या अंत:प्रेरणा तपासून पाहत स्वत:ला आणि स्वत:तील कलेला, कलाकाराला घडवत राहावं असा अतिशय मूलभूत विचार ते कायम जगलेले आहेत व मांडतही आलेले आहेत. माणसातल्या चिरंतनाला आवाहन करणं, स्वत:ला शक्य तितक्या निकोप स्वरूपात मांडणं हे समाजाप्रती, सामूहिक संवेदनांप्रती दिलेलं मोठंच योगदान असतं.








