महाराष्ट्र फाऊंडेशन वाङ्मयप्रकार पुरस्कार – ‘विज्ञानकथा’ २०२० – सुबोध जावडेकर
वैज्ञानिक प्रगतीने मानवी जीवन बरंच सुखकर बनवलं हे सर्वमान्य आहे. मात्र आज वैज्ञानिक विकासाने जे गुंते निर्माण केलेत ते विवेकी समाजाच्या लक्षात येऊ लागले आहेत. सुबोध जावडेकरांना तर हे गुंते काही काळ आधीच दिसायला आणि जाणवायला लागले होते. त्यांच्या कथांत याबद्दल सूचक इशारे आहेत. विज्ञानप्रसारासाठी विशेष साहित्याची आवश्यकता असते. सुबोध जावडेकर यांसारखे वैज्ञानिक ‘कथेचं विज्ञान’ही जाणतात. अंतरीक्षयान, मंगळावर स्वारी, उडत्या तबकड्या या विषयांवरल्या कल्पित कथा म्हणजे विज्ञान कथा असा वाचकांचा समज होऊन बसला होता. सुबोध जावडेकरांनी विज्ञान कथांना या साचेबंद विश्वातून बाहेर काढलं. त्यांचे ‘चाहूल उद्याची’, ‘गुगली’, ‘कुरुक्षेत्र’, ‘पुढल्या हाका’, ‘आकांत’, ‘वामनाचे चौथे पाऊल’ यांसारख्या अनेक साहित्यकृती आजवर प्रकाशित झालेल्या आहेत.








